मुंबई, 17 June : जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांचा धम्म भारतातुन चीनमध्ये आणि सर्व जगात प्रसारित झाला आहे.त्यामूळे भारताने चीनला बुद्ध दिला असून युद्ध दिलेले नाही. आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. पण चीन ला जर युद्धाची खुमखुमी असेल तर चीन ला कायमचा धडा शिकवू अशी ताकद भारतीय सैन्यात आहे, असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
लडाख येथील गलवाण येथे चीनच्या सैन्याशी झालेल्या चकमकीत आपले 20 जवान शहीद झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून भारत सरकार शाहिद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीशी मजबूत उभे आहे. भारत चीन सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी सर्व भारतीय एकजुटीने उभे आहेत, असे आठवले म्हणाले.
चीन हे धोकेबाज राष्ट्र आहे.चीनच्या भारतातील वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे. चिनी खाद्य पदार्थांवर ही बहिष्कार घातला पाहिजे. चायनीज फूड चे हॉटेल्स आणि चायनीज फूड वर भारतात बंदी घालण्याचे आवाहन आठवले यांनी आज केले.
चीन ने 1962 मध्ये भारताला धोका देऊन हल्ला केला होता. आता भारताचे सैन्य अधिक मजबूत असून चीनला धडा शिकविण्याची ताकद भारतीय सैन्यात आहे. आता भारतात आमचे कोरोना शी युद्ध सुरू आहे. त्यामुळे युद्ध करण्याची आमची ईच्छा नाही. भारत शांती आणि अहिंसेच्या तत्वार ठाम आहे. पण जर चीन युद्ध करू इच्छित असेल तर कोरोना शी होत असलेले युद्ध आणि सीमेवर चीन शी युद्ध आम्ही जरूर जिंकू असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच भारतात चायनीज फूड हॉटेल आणि चायनीज खाद्यपदार्थांवर सर्वांनी स्वयंस्फूर्त बहिष्कार घालावा; चायनीज फूड हॉटेल वर बंदी घालावी असे आवाहन आठवले यांनी आज केले.