नवी दिल्ली : वीजेच्या सीमेपार व्यापारात भारत पहिल्यांदाच वीजेचा निर्यातदार ठरला आहे. केंद्रीय वीज प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये फेब्रुवारी महिन्यांपर्यंत भारताने सुमारे ५,७९८ दशलक्ष युनिट वीज, नेपाळ, बांग्लादेश, म्यानमार आणि भूतानला निर्यात केली आहे. गेल्या तीन वर्षात, नेपाळ बांग्लादेशला निर्यात होणाऱ्या वीजेत लक्षणीय वाढ झाली आहे.
८० च्या दशकापासून, भारताने वीजेबाबत सीमापार व्यापार सुरु केला. मात्र, तेव्हापासून भारत, भूतानकडून वीज आयात करत होता. तर, नेपाळला अतिशय कमी प्रमाणात वीज निर्यात करत होता. गेल्या वर्षभरापासून नेपाळला होणाऱ्या वीज निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. बांग्लादेशालाही सध्या भारतातून 600 मेगावॅट वीज निर्यात केली जाते. नेपाळला होणाऱ्या वीज निर्यातीत लवकरच वाढ होईल, अशी माहिती प्राधिकरणाने दिली आहे.