मुंबई (प्रतिनिधी): बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी उपक्रमातील सुमारे ४८९४ पदे कमी करण्यात येणार आहेत. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. बेस्टने याबाबतचा प्रस्ताव समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला आहे.
बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असून करोडोंचे कर्ज आहे. कामगारांचे पगार ही वेळेवर होत नाहीत. दैनंदिन कारभार चालविण्यासाठी बेस्टला विविध बँकांचे कर्ज घ्यावे लागत आहे. बेस्टने सन २०१७-१८ चा ५६० कोटी तर सन २०१८-१९ चा ८९० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. तसेच बेस्टला आर्थिक मदत मिळावी म्हणून पालिकेकडे मदत मागितली. मात्र, आयुक्तांनी बेस्टला मदत करण्यापूर्वी बेस्ट उपक्रमात सुधारणा सुचवल्या. कामगारांचे भत्ते गोठवणे, कामगारांची पदे न भरणे, बेस्ट ताफा आणि प्रवाशांच्या भाड्यात सुधारणा करणे आदी सुचनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यानुसार बेस्टमधील सुमारे ४८९४ कामगारांची पदे कमी केली जाणार आहेत. त्यात सुरक्षा व दक्षता विभागातील १७९, स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील ७९, विद्युत पुरवठा विभागातील ३९४, परिवहन अभियांत्रिकी विभागातील ८७५, तर वाहतूक विभागातील ३३६७ कामगारांचा समावेश आहे. तसेच बसचालकांची १५९५, वाहकांची १६५७, स्वचकांची ३००, मॅकेनिकची ३०८, जोडारी १५३, नवघाणी २५० पदांचा समावेश आहे.