रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथे बेकायदा बैलाच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या दोघाना ग्रामस्थांनी सापळा रचून पकडले. रविवारी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिंगणी मोहल्ला रेती बंदर या भागात बैलाची हत्या करून त्याचे मांस रत्नागिरीत विकले जात असल्याची कुणकुण ग्रामस्थांना लागली होती. अशा प्रकारचे मांस घेउन एक रिक्षा आज सकाळी रत्नागिरीत जाणार असल्याचे समजताच ग्रामस्थ महेश देसाई, दीपक शिंदे, सागर देसाई, सुरेश दसम व सहकार्यानी सकाळीच या भागात पाळत ठेवली. सकाळी ७:३० च्या दरम्यान रिक्षा क्रमांक एम. एच. ०८ – के – २२४७ ही जाकादेवी मार्गे रत्नागिरीकडे जात असल्याचे लक्षात येताच या ग्रामस्थांनी या रिक्षाचा पाठलाग सुरु केला. डिंगणी ते जाकादेवी दरम्यान कोंड्ये लावगण भागात हि रिक्षा पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. या रिक्षात चालकासह एक इसम व सिमेंट च्या पिशवीत मांस असल्याचे पाहून ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण केले.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक महेश थिटे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रिक्षासह मांस व दोघाना ताब्यात घेतले आणि हि वरात संगमेश्वर पोलिस ठाण्यात आणण्यात आली. यामधे रिक्षात असलेला समिर अहमद वागळे (डिंगणी ) आणि चालक निसार अहमद कासिम सोलकर या दोघांवर पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५ , ५ ब, ५ क अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर ५० हजार किमतीची रिक्षा आणि सिमेंटच्या पिशवीत सापडलेले मांस जप्त करण्यात आले आहे. या मांसाची प्रयोगशाळेत तपासणी झाल्यावर ते कसले होते ते सिद्ध होइल असे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी इंगळे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्याला भेट देत कारवाईचा आढावा घेतला.