मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सर्वांसाठी स्फूर्ती देणारे, प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वाटचालीमध्ये त्यांनी ठसा उमटवला. सर्वांना प्रेरणा मिळेल, असे त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी सर्व त्या मान्यता दिल्या असून पर्यावरणीय मान्यता अंतिम टप्प्यात आहे. स्मारकाच्या निर्मितीमध्ये शासन आवश्यक ती सर्व मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. महापौर बंगला येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोकसभेचे माजी अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, आनंदराव अडसूळ, पुनम महाजन, आमदार सुनील राऊत, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियातील सदस्य उपस्थित होते.
बाळासाहेबांनी समाजातील तळागाळातल्या माणसाला जागृत करुन त्याला नेतृत्व दिले, मोठे केले, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, बाळासाहेबांनंतरही त्यांचे विचार कायम रुजावेत, यासाठी त्यांच्या राष्ट्रीय स्मारकाची संकल्पना उभी राहिली. त्यांचे यथोचित असे स्मारक मुंबईत व्हावे अशी राज्यातील सर्व घटकांची इच्छा होती. त्यानुसार महापौर बंगला येथे हे स्मारक उभे राहण्यासाठी सर्व प्रकारची मान्यता देण्यात आली आहे. आवश्यक तेथे कायद्यात बदल करण्यात आले. पर्यावरणाची मान्यता अंतिम टप्प्यात आहे. समाजाला प्रेरणा देणारे सुंदर असे त्यांचे स्मारक येथे उभारले जाणार आहे. स्मारकाची निर्मिती ट्रस्टच्या माध्यमातून होणार असली तरी राज्य शासन या स्मारकाच्या निर्मितीमध्ये आवश्यक ती सर्व मदत करेल, असेही ते म्हणाले. आजच्या डिजिटल युगात बाळासाहेबांच्या स्मारकासंदर्भात आणि त्यांच्या जीवनपटासंदर्भात सर्व गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी चांगले संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांचे विचार आणि ऊर्जा जनतेपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला 2 कोटी रुपये
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे स्वत: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या लोकप्रतिनिधिंनी मानधनातून एकूण 2 कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश ‘मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधी’साठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ठाकरे आणि शिवसेनेचे आभार मानले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वजण आहोत असा संदेश या माध्यमातून जाईल, असेही मुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाले. बाळासाहेबांच्या मनात शेतकऱ्यांच्या विषयी प्रचंड संवेदना होती. हीच संवेदना जिवंत ठेऊन राज्य शासन शेतकऱ्याला संपूर्ण संकटातून बाहेर काढून शाश्वत शेतीकडे नेण्याचा संकल्प करत आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले