रत्नागिरी, (आरकेजी) : भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारला 31 ऑक्टोबरला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्र व राज्य सरकारने निर्माण केलेल्या विश्वास व विकासाच्या कामाला जनतेने पाठिंबा दिला आहे. विकासकामे गावागावात जाऊन जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिली.
यासंदर्भात मुंबईत भाजपच्या पदाधिकारी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी बैठक घेतली. बाळ माने म्हणाले, भाजप सरकारची कामे सांगताना कार्यकर्ते लोकांशी संवाद साधणार आहेत. संपर्क-संवाद- सेवा हा भाजपाचा आत्मा आहे.
गेल्या तीन वर्षांत भाजपाला राज्यात महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी भाजपाला स्वीकारले आहे. सरकारच्या कामांचा हजारो लोकांना लाभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास व विकासाचे नवे पर्व देशात सुरू केले. भाजपच्या राज्य सरकारनेही त्याच मार्गाने काम केले आहे. त्यामुळे भाजपाच्या विरोधात विषारी प्रचार केला तरीही सामान्य माणसाने पक्षाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे.
सरकारची तीन वर्षे पूर्ण होत असताना आपल्या सरकारची कामे सांगण्यासाठी छोट्या समूहांच्या बैठका आयोजित केल्या जाणार असल्याचे बाळ माने यांनी सांगितले. देशाच्या विकासाची व राजकारणाची दिशा ठरविण्याच्या स्थितीत भाजपने योगदान देत आहे. समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे. पारदर्शी सरकारच्या बाबतीत आपल्या सरकारने मोठे परिवर्तन घडविले आहे. सरकारच्या सर्व कामांची नोंद जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे, असे माने यांनी सांगितले