
डोंबिवली, 15 मे (प्रशांत जोशी) : राज्यातील उद्योगचक्र पूर्वपदावर येत असून हजारो नव्या उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, डोंबिवली औद्योगिक विभागातील 20 कारखान्यांना कारणे दाखवा, बंद करा अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कार्यालय कल्याण व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी सुमारे 20 कारखान्यांना नोटीस देऊन त्रुटी दूर करेपर्यंत बंदचा बडगा उभारला आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प असताना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने काही कंपन्यांना बंदची नोटीस दिली आहे. कल्याण शीळ रस्त्यावरील “अलंकेमि लॅबोरेतीज ” ही 50 वर्षे जुनी नावाजलेली कंपनी असून मध्यतरी या कंपनीत आग लागली होती. तेव्हापासून विविध प्रकारे त्यांना नोटीस देण्यात आली.
” डोंबिवलीतील काही कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस व बंदची नोटीस दिली असली तरी त्रुटी दूर केल्यावर त्या सुरू करण्यात येतील रासायनिक कंपन्या कायम बंद व्हाव्यात अशी भूमिका नाही ” – शंकर वाघमारे, प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक अधिकारी