रत्नागिरी : नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सर्व स्तरांचा विचार करण्यात आला आहे. येत्या काळात या अर्थसंकल्पामुळे विकासाची नवनवीन दालने खुली होणार आहेत. पर्यायी राज्याचा विकास साधण्यात महत्वाचे कार्यदेखील होणार आहे, असे स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष आणि अर्थतज्ञ ऍड. दिपक पटवर्धन यांनी सांगितले. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाविषयी माहिती व्हावी, यासाठी जिल्हा माहिती कार्यालयात चर्चासत्र झाले. या अर्थसंकल्पामुळे राज्यात नवनवीन उद्योग, प्रकल्प निर्मिती होणार आहे. त्यामुळे राज्याच्या महसूलात मोठया प्रमाणात वाढ होणार आहे. तसेच विविध प्रकल्पांना चालना मिळून बेरोजगारीला आळा बसण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
कोकणाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत : सुकांत चक्रदेव
अर्थसंकल्पाचे गाढे अभ्यासक सुकांत चक्रदेव म्हणाले की, सरकारने कोकणासाठी भरीव तरतूद केली आहे. यामुळे कोकणचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक महसूलामध्ये वाढ होऊन नवनवीन रोजगार निर्मित होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे मच्छीमारांचासुध्दा या अर्थसंकल्पामध्ये विचार केला गेला आहे. कोकणातील किनारपट्टी लगत असणाऱ्या सर्व मच्छीमारांना त्यांचे उत्पन्न वाढविण्यास वाव मिळणार आहे. व्यापारी, नोकरदार, शेतकरी, तरुणवर्ग, ज्येष्ट नागरिक तसेच महिला वर्ग या सर्वांचा समग्र विचार केला गेला आहे. हा अर्थसंकल्प राज्याला नक्कीच विकासाच्या वाटेवर नेणारा आहे. यावेळी दैनिक रत्नभूमीच्या संपादिका धनश्री पालांडे, कर्मचारी वर्ग व स्थानिक नागरिक उपस्थित होते.