रत्नागिरी (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीचे अचूक भाकित सांगून २१ लाख जिंका, असे जाहीर आव्हान अंनिसने महाराष्ट्रातील ज्योतिषांना पत्रकार परिषदेतून केले. याप्रसंगी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य कार्यवाह डॉ.नितीन शिंदे, ज्योतिष विश्लेषक प्रकाश घाटपांडे, जिल्हाध्यक्ष विनोद वायंगणकर उपस्थित होते.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वादळ घुमत आहे. तर दुसरीकडे त्यांचे भविष्य सांगण्यासाठी भोंदुगिरीही सुरु आहे. त्यांचे हे भविष्य प्रसार माध्यमांमार्फत लोकांसमोर येते. त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांमध्ये गैरसमज पसरतात आणि अंधश्रध्दा निर्माण होते, असा संघटनेचा अनुभव आहे. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या अशा वृत्तींविरोधात ठाम भुमिका घेण्यासाठी महाराष्ट्र अंनिसने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तून बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे. सन २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळीही ही आव्हान प्रक्रिया राबवलेली होती. किंबहुना महाराष्ट्रातील स्वत:ला नामवंत म्हणवणाऱ्या ज्योतिषांना सदर आव्हान प्रक्रिया रजिस्टर पोस्टाने पाठवली होती. परंतु, एकाही ज्योतिषाने महाराष्ट्र अंनिसचे हे आव्हान त्यावेळी स्वीकारले नव्हते, असे अंनिषने म्हटले आहे. यंदा समितीमार्फत एक प्रश्नावली दिली असून एकूण २५ प्रश्न यात असतील. लोकसभा निवडणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षांना मिळणाऱ्या जागा, निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या मतांची टक्केवारी, महत्वाच्या मतदरसंघातील विजयी उमेदवार, सर्वात जास्त मताधिक्क्याने विजयी होणाऱ्या उमेदवाराचे नाव, सर्वाधिक मताधिक्य मिळविणारी महिला उमेदवार, नोटा पर्यायाचा सर्वाधिक वापर करणारा मतदारसंघ अशा स्वरूपाचे प्रश्न सदर प्रश्नावलीत असणार आहेत.