रत्नागिरी, प्रतिनिधी : कोरोनाच्या लाटेमुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या, अन शाळेच्या अबोल भिंती पुन्हा एकदा बोलक्या झाल्या.. सुन्यासुन्या असलेल्या वर्गखोल्यांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट सुरू झाला आहे. बऱ्याच कालावधीनंतर शाळा, शिक्षक यांची प्रत्यक्षात भेट झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचं चित्र सध्या जिल्ह्यातील शाळांमध्ये आहे.
सध्या शाळा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात उत्साहाची लहर आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विशेष खबरदारी देखील घेतली जात आहे. संगमेश्वर तालुक्यातील पी एस बने इंटरनॅशनल स्कुलमध्ये देखील विशेष खबरदारी घेतली जात आहे. ग्रामीण भागातील ही शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे पुन्हा एकदा गजबजून गेली आहे. पण इथलं चित्रं पाहता या शाळेत गेले दीड वर्ष विद्यार्थीच आलेले नाहीत यावर विश्वासच बसणार नाही. कारण शाळा परिसरात असलेली स्वच्छता, सजावट आणि विद्यार्थी, शिक्षकांचा उत्साह..
आता मात्र शाळेत खंड नको – विद्यार्थी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापनाकडून शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं तापमान, ऑक्सिजन लेव्हल चेक केली जाते. आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जातो. शाळा सुरू होऊन दोन दिवस झाले आहेत. आता मात्र शाळेत खंड पडायला नको, आणि कोरोना लवकरात लवकर जाऊदे अशी प्रार्थना इथले विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
दरम्यान विद्यार्थ्यांचं आगमन झाल्याने शिक्षक वर्गही खुश आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू झालं होतं, शाळेत यायला लागत नसल्याने सुरुवातीला मुलं खुश होती, मात्र ऑनलाइन शिक्षणात अनेक अडचणी मुलांना येत होत्या, त्यामुळे आम्हीही अस्वस्थ होतो, मुलंही नाखूष होती, पण आता दीड वर्षानंतर पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्याने नक्कीच आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया पी एस बने इंटरनॅशनल शाळेतील शिक्षिका संपदा भिंगार्डे यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांचं नुकसान थांबलं – रोहन बने
दरम्यान गेलं दीड वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एकप्रकारे दुरावा निर्माण झाला होता, आणि तो जाणवतंही होता. त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होत होतं ते आता शाळा सुरू झाल्यामुळे थांबल्याची प्रतिक्रिया संस्थेचे विश्वस्त रोहन बने यांनी दिली आहे.















