रत्नागिरी दि.15:- जिल्ह्यातील आंबा, काजू या फळपिकासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन 2021-22 च्या आंबिया बहार करीता 18 जून 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत आहे.
आंबिया बहार सन 2021-22 मध्ये फळपिकनिहाय योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता काजू व आंबा या पिकासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2021 आहे. सदर योजनेकरीता जिल्ह्यात रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अंत्यत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पत पुरवठ्यामध्ये सातत्य राखणे, उत्पादनातील जोखमीपासून संरक्षण ही या योजनेची वैशिष्ठ्ये आहेत.
पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकासाठी ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी न होण्याकरीता घोषणापत्र अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेला देणे बंधनकारक आहे. या योजनेत अधिसूचित क्षेत्रात फळपिके घेणारे (कुळाने/भाडेपट्टीने) शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. आंबिया बहारातील गारपीट या हवामान धोक्यासाठी अतिरिक्त विमा संरक्षण देण्यात येते. अतिरिक्त विमा हप्ता रक्कम शेतकऱ्यांना देय आहे. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकासाठी चार हेक्टर क्षेत्र मयादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे व उत्पादनक्षम फळबागांना (उत्पादनक्षम वय ५ वर्षे) विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे.