रत्नागिरी : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि इतर मार्गांवर झालेल्या अपघातांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. मार्च २०१८ अखेरच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १८८ अपघातांमध्ये ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला तर १२९ जण गंभीर आणि १३८ जण किरकोळ जखमी झाले. २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये अपघातांची संख्या आणि अपघातातील मृतांची संख्या या दोन्हीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मुंबई गोवा माहामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. कोकणात येणा-या तसेच गोव्याकडे जाणा-या गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे साहजिकच अपघाताचे प्रमाणही तेवढेच वाढले आहे. अति वेग, बेफिकीरी हीच प्रामुख्याने अपघातांची कारणे आहेत.२०१८ मध्ये महामार्ग, राज्यमार्ग आणि इतर मार्गांवर १८८ अपघात झाले. यामध्ये महामार्गावरील ९७ अपघातांमध्ये २६ जणांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये २३ पुरूष आणि ३ स्त्रियांचा समावेश आहे. २२ गंभीर अपघातांमध्ये ५७ जण गंभीर जखमी झाले आहेत आणि २४ किरकोळ अपघातांमध्ये ८६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. राज्यमार्गांवर एकही फेटल अपघात झालेला नाही. तर ९ गंभीर अपघातांमध्ये १४ जण गंभीर जखमी आणि दोन किरकोळ अपघातांमध्ये तीनजण जखमी झाले. इतर मार्गांवर झालेल्या ११ अपघातांमध्ये ११ जणांचा जीव गेला आहे. २५ गंभीर अपघातांमध्ये ५८ जण गंभीर जखमी आणि २९ किरकोळ अपघातांमध्ये ४९ जण किरकोळ जखमी झाले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या अपघातांच्या तुलनेत २०१८ मधील अपघातांची संख्या आणि अपघातातील मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. २०१७ मध्ये ७८८ अपघात झाले होते. यामध्ये १४० जणांचा जीव गेला होता. यावर्षी मृतांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. २०१७ मध्ये गंभीर अपघातांची संख्यादेखील २४७ इतकी होती. यामध्ये ६४४ जण गंभीर जखमी झाले होते. तर २१३किरकोळ अपघात झाले होते. याशिवाय २०३ विनादुखापत अपघात झाले होते.एप्रिल २०१८ मध्ये ७७ अपघात झाले आहेत. ७५ अपघातांपैकी ११ अपघात फेटल झाले आहेत. यामध्ये १२ जणांचा मृत्यु झाला आहे. यापैकी ८ अपघात महामार्गावर आणि तीन अन्य मार्गांवर झाले आहेत. बारा जणांमध्ये अकरा पुरूष आणि एका महिलेचा मृत्यु झाला. याशिवाय २१ गंभीर अपघातांमध्ये ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. २३ किरकोळ अपघातांमध्ये ५२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. याशिवाय २० विनादुखापत अपघात झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनांमध्ये प्रामुख्याने कंटेनर, डंपर व कार आणि दुचाकी यांचा समावेश सर्वाधिक आहे. हे अपघात प्रामुख्याने वाहन चालकांच्या चुकीमुळीचे झाल्याचे उपविभागीय प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वाहनचालकाचा निष्काळजीपणा व वेगावर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश ही प्रमुख कारणे आहेत. यातील काही अपघात हे अवघड वळणांवर झालेले आहेत.