
( फोरम अध्यक्ष गुलाब वझे यांचे गौरउद्गार )
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : पूर्वी समाजात शिक्षणाला महत्व मिळत नव्हते. गरीबी काळातही आई-वडील शेती-भाजीपाला-मोलमजुरी करून मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत होते पण त्याला मुले प्रतिसाद देत नसत. पण आता शिक्षणाचे महत्व समाजातील प्रत्येकाला समजून चुकले आहे. ज्या उद्देशाने 32 वर्षांपूर्वी समाजात शिक्षणाचे महत्व वृद्धिंगत व्हावे यासाठी आगरी युथ फोरमची स्थापना केली. आज ते उद्दीष्ट सफल झाल्याचा आनंद होत आहे. आज शैक्षणिक क्षेत्रात तसेच इतर प्रत्येक क्षेत्रात आगरी समाजातील विद्यार्थी आघाडीवर आहेत, इतकेच नाही तर उच्च श्रेणीतून आगरी मुले यशस्वी होत आहे. विदयार्थ्यांच्या या शैक्षणिक यशामुळे संस्थेतील प्रत्येकजण आनंदी आहे असे गौरवपूर्ण वक्तव्य माजी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात केले.
डोंबिवली पूर्वेकडील होरायझन सभागृहात आगरी युथ फोरम माध्यमातून यशस्वी विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी गुलाब वझे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जगन्नाथ पाटील, दि.बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामांतर समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, सर्व पक्षीय हक्क संरक्षण समितीचे सचिव चंद्रकांत पाटील, ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाबाजी पाटील, कडोंमपा माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, महाराज चेतन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात समाजातील प्रथम वर्गात उत्तीर्ण झालेल्या ४०० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वझे पुढे म्हणाले, डोंबिवलीतील आगरी युथ फोरम ही संघटना मागील 32 वर्षे समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी झटत आहे. ९०व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अयोजकत्वाचा मान मिळवत या संस्थेने राज्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. संस्थे तर्फे मागील 32 वर्षे यशस्वी विद्याथ्याच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन केले जाते कोरोनामूळे मागील दोन वर्षे खंड पडलेला हा उपक्रम यंदा उत्साहात साजरा होत आहे. केवळ १० वी १२ वी नव्हे तर विविध टप्याटप्यावर यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार होत आहे.
तर यावेळी माजी मंत्री पाटील यांनी एकेकाळी शिक्षणा पासून दूर असलेला समाज शिक्षणाच्या प्रवाहात येत असून सगळ्या क्षेत्रात समाजाचे विद्यार्थी चमकत आहेत ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना शाबासकी दिली. यावेळी रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदतीचा हात मिळेल असे जाहीर केले.
दरम्यान महाराष्ट्र् लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वर्ग १ मध्ये उत्तीर्ण झालेल्या आगरी समाजातील सायली ठाकूर म्हणाली प्रत्येक विद्यार्थ्याने मोठी स्वप्ने बघितली पाहिजेत. ज्या क्षेत्रांत करिअर करायचे आहे त्या क्षेत्रात उच्च पदावर जाण्यासाठी नियोजन करत त्याला मेहनतीची जोड दिली तर यश निश्चित मिळतेच पण त्यासाठी कठोर मेहनतीची जोड हवी.
सोहळ्यात ६०० लोकवस्ती असलेल्या घारीवली गावात आतापर्यंत १२ विद्यार्थ्यांनी एमबीबीएस ही मानाची पदवी मिळवत गावाला डॉक्टर अशी ओळख मिळवून दिल्याबद्दल या गावचे कौतुक करण्यात आले.















