मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्ट रोजी 6 वर्ष पूर्ण होत असून हत्येच्या सूत्रधाराचा तपास लागलेला नाही. सूत्रधार अद्यापही मोकाट आहे. कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम एम कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्या झाल्या. हिंसेच्या घटनात वाढ होतच आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ हा संदेश देत निर्भय मॉर्निंग वॉक दहिसर येथे करण्यात आला.
हिंसक घटनांचा महाराष्ट्र अंनिसने नेहमीच निषेध केला आहे. मानवतेचा पुरस्कार करणारा लढा सतत चालूच ठेवू असा निर्धार अंनिसच्या दहिसर शाखेच्या प्रधान सचिव निशा यांनी केला. रविवारी सकाळी 7 वाजता दहिसर पूर्व रेल्वे स्टेशन पासून ही निर्भय रॅली सुरू झाली. जरीमरी गार्डन येथे रॅलीची सांगता झाली. मुंबई जिल्ह्यातील व आसपासच्या परिसरातील सर्व कार्यकर्ते व मानवतावादी नागरिक रॅलीत सहभागी झाले.
महाराष्ट्र अंनिस तर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार कोण? असा सवाल विचारणारे निवेदन मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना देणार असल्याचे महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशीलकर यांनी सांगितले. तसेच 20 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून सर्वत्र साजरा केला जात असल्याचे ही त्यांनी नमूद केले.