मुंबई, 1 जून : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र 12 तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 12 तासांमध्ये त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. २ ते ३ जून या काळात राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर ६५ ते ८५ किलोमीटर प्रती तास असा वाऱ्याचा असेल. हा वेग वाढून ३ जून रोजी सकाळी महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीजवळ ९० ते ११० किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे 3 जूनला संध्याकाळी किंवा रात्री रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि गुजरातजवळील दमन येथे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई हवामान विभागाच्या तज्ञ शुभांगी भुत्ते यांनी दिली.
मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवार ३ जून रोजी मुंबईतील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या काळात वाऱ्यांचा जोरही वाढलेला असेल. ३ आणि ४ जून या दिवशी मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असाही इशारा देण्यात आला आहे. तर सध्या समुद्रात असलेल्या मच्छिमारांनी किनाऱ्याकडे परतावे अशा सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. ३ आणि ४ जून रोजी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.