रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी 22 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाला हे अहवाल प्राप्त झाले.जिल्ह्यात एकाच दिवशी 20 पेक्षा जास्त रुग्ण सापडल्याची ही पहिलीच वेळ आहे. ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 66 झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 1 मे पर्यंत जिल्ह्यात एकूण 6 रुग्ण होते. पैकी एकाचा मृत्यू झाला होता, तर 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर आली होती. त्यानंतर 2 मे रोजी पुन्हा दोन कोरोना रुग्ण सापडले. त्या दिवसापासून ही संख्या वाढतच गेली. कधी 4, तर कधी 5, एके दिवशी तर 13 रुग्ण सापडले होते. या दरम्यान आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला. मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 52 वर पोहचली होती.
बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांपैकी 22 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. या रुग्णांमध्ये मंडणगडमधील 11, रत्नागिरीतील 7 आणि दापोलीतील 4 जणांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातील आणखी एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याचं आज आलेल्या अहवालात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत नर्सिंगच्या एकूण 5 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या या 66 रुग्णांपैकी 5 रुग्ण सोडले तर बाकी सर्व 61 रुग्णांची ट्रॅव्हल्स हिस्ट्री मुंबई आहे. मुंबईकर कोरोनाचे वाहक ठरत असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आणखी कडक पावलं उचलण्याची आवश्यकता आहे, नाहीतर परिस्थिती आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.