मुंबई, विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्रतर्फे स्वाध्याय (SWADHYAY) स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट उपक्रमात ६ आठवड्यांमध्ये ११ लाख विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडून साप्ताहिक सराव आणि गृह शिक्षण करवून घेण्यात येत असून हा उपक्रम व्हॉट्सअॅपवर उपलब्ध आहे. या उपक्रमाची व्याप्ती आणि सहजता यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात, असा दावा केला आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्रतर्फे स्वाध्याय (SWADHYAY) – स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना उपक्रमाचे उदघाटन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आणि वंदना कृष्णा, अप्पर मुख्य सचिव, शालेय विभाग, महाराष्ट्र राज्य; विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या उपक्रमाद्वारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), महाराष्ट्रतर्फे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत संपर्क आणि संवादाचे माध्यम म्हणून व्हॉट्सअॅप वापरुन सरावासाठी स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या माध्यमातून पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या फोनवर क्विझ (प्रश्नमंजुषा) घरच्या घरी फोनवर उपलब्ध असतील आणि त्याचा उपयोग करून शिक्षक पालक आणि विद्यार्थी स्वतःस शैक्षणिक सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती मिळू शकेल. स्वाध्याय हा उपक्रम मुख्यतः राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढविण्याचे एक साधन म्हणून वापरले जात आहे.
सोबतच आता स्वाध्यायवर एक नवीन फिचर जोडले जात आहे. आता स्वाध्यायमध्ये युडीआयएसई (UDISE) कोड जोडला जात असून शिक्षक भविष्यात स्वतःच्या शाळेतील, वर्गातील विद्यार्थी यांची कामगिरी बघू शकतील आणि विद्यार्थ्यांना मदत करू शकतील. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून इतर लवकरच उर्दू माध्यम, विज्ञान, विद्यार्थ्याचे सामाजिक भावनिक जग याबाबतचाही घटक सुरू होणार असून विद्यार्थ्यांना स्वाध्यायाद्वारे शैक्षणिक सहकार्यासोबतच इतर बाबतीतही सहकार्य केले जाणार आहे. स्वाध्यायामुळे आता प्रत्येक घर आणि वस्ती शाळा झाली आहे आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण ही समाजातील प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.
स्वाध्याय उपक्रमाबद्दल उच्च प्राथमिक शाळा, पळसोडी, जिल्हा गोंदिया येथील पूर्वा जांभूळकर हिने कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे युट्युबमधील घटकांवर अवलंबून राहावे लागे. परंतु आता स्वाध्याय उपलब्ध झाल्याने मी, माझी बहीण आणि माझ्या मैत्रिणी या एकाच फोनवरून ठाराविक वेळेत स्वाध्याय सोडवितो. अडचणींबद्दल दीक्षा अॅपचे व्हिडिओ पाहतो आणि शिक्षकांना विचारतो. स्वाध्यायामुळे अभ्यासात मजा येते आणि नवीन शिकण्यास मिळते.
‘कोरोना विषाणूंमुळे अचानक करण्यात आलेले लॉकडाउन आणि त्यामुळे बंद झालेल्या शाळा यामुळे एक संकट निर्माण झाले होते. पण शासनाच्या शाळा बंद पण शिक्षण आहे उपक्रमातंर्गत शिक्षण विभाग आणि शिक्षकांनी अनेक उपक्रम राबविले. त्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्हींचा समावेश होता. त्यामुळे शाळा बंद असल्यातरी विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र चालू राहिले. या लॉकडाउन च्या काळात विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण जात होते पण विद्यार्थी किती आणि कसे शिकत आहेत हे जाणून घेण्यास मर्यादा होत्या. स्वाध्यायामुळे ती अडचण दूर होण्यास मदत झाली आणि विद्यार्थी किती शिकले आणि कुठे त्यांना सहकार्याची आवश्यकता हे समजते.- आनंद पळसे, गटशिक्षणाधिकारी, सातारा
बहुतेक लोक अशिक्षित आहेत. ते स्मार्टफोन वापरु शकत नाहीत, ऑनलाइन क्लासमध्ये त्यांच्या मुलांना सहभागी होण्यास अडचणी येतात. परंतु या स्वाध्यायमुळे विद्यार्थ्याना स्वतः विषय शिकण्याची चिंता करण्याची गरज नाही. आता, समुदायामध्ये दररोज एक तास एक वर्ग होतो आणि जेथे विद्यार्थी अडकतात, त्यांचे शिक्षक नेहमीच त्यांना मदत करण्यासाठी उपलब्ध असतात. पिंटू चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते, पेरले, कराड तालुका