मुंबई : राज्यातील मासळी साठ्यांचे जतन आणि मच्छिमारांचे जीवित व वित्त यांचे रक्षण करण्यासाठी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत सागरी किनारपट्टी पासून १२ मैलापर्यंत यांत्रिकी मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे.
पावसाळी मासेमारी बंदी ही फक्त यांत्रिकी मासेमारी करण्याऱ्या नौकांना लागू असणार आहे. पारंपरीक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू राहणार नाही. बंदी कालावधीच्या दरम्यान यांत्रिकी मासेमारी नौका मासेमारी करतांना आढळल्यास ‘महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम’ अंतर्गत गलबत जप्त करुन, त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येणार आहे.
बंदी कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असल्याने मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेच खराब वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवीत व वित्त हानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. या कालावधीच्या दरम्यान ज्या संस्थांच्या यांत्रिक मासेमारी नौका मासेमारी करतांना आढळतील अशा संस्थांचे पुरस्कृत केलेले अर्ज ‘राष्ट्रीय सहकार विकास निगम’ योजनेच्या लाभाकरीता विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच पावसाळी मासेमारी करताना अपघात झाल्यास यांत्रिकी मासेमारी नौकेस शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही. १ जूनपूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना १ जून नंतर कोणत्याही परीस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी नसून अशा नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
राज्याच्या सागरी जलाधी क्षेत्रात सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत मासेमारी बंदी कालावधीत यांत्रिकी नौकेने बेकायदेशीर मासेमारी न करण्याबाबत आपल्या सर्व नौकाधारक सभासदांना व सर्वसाधारण सभासदांना अवगत करावे. तसेच या कालावधीत आपल्या संस्थेच्या सभासदांकडून यांत्रिकी मासेमारी केली जाणार नाही व पावसाळी मासेमारी बंदीचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, मुंबई यांनी केले आहे