मुंबई : ईशान्य भारतातील समस्या आणि त्यांचे निवारण कसे करावे, याबद्द्ल माहिती देताना नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य.मुंबई : ईशान्येकडील राज्ये आणि तेथील नागरीक यांना आपल्या देशाने अद्यापही स्वीकारलेले नाही. त्यांना देशाच्या मूळ प्रवाहात सामावून घ्यायला हवे, त्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांच्याकडे पाहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी केले. उपनगर शिक्षण मंडळाने जुहू येथील विद्यानिधी एज्यूकेशन कॊंम्प्लेक्स येथे घेतलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
नैसर्गिक साधनांचे प्रमाण ईशान्य भारतात जास्त आहे. मात्र, काही गोष्टींमुळे तेथील विकासाला खीळ बसली आहे. येथे विकास झाल्यास संपूर्ण भारताचा विकास होऊ शकतो, असेही आचार्य यांनी सांगितले. देशाचा एक भाग पूर्णपणे मागासलेला आहे. त्यामुळे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासापासून वंचित अशा या समाजाच्या विकासासाठी आपण आपले योगदान द्यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. देशातील अनेक विद्यापीठांमध्ये परकीय भाषा शिकविल्या जातात. तेथे ईशान्य भारतात बोलल्य भाषा शिकविल्या जाव्यात. त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आपुलकीची भावना वाढण्यास मदत होईल, असेही पद्मनाभ यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात स्थापन झाले आणि ईशान्य भारतातील दहशतवादी कारवायांना आळा बसला आहे, अशी माहितीही राज्यपालांनी दिली. सरकारने राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्यास समाजाचा विकास होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.