नाशिक, दिनांक 3 डिसेंबर, 2021(जिमाका वृत्तसेवा): मराठी भाषा विभागाच्यावतीने ‘अभिजात मराठी दालन’ उभारण्यात आले आहे. मराठी भाषा अभिजात कशी आहे याची माहिती व ‘अभिजात मराठी’ची ऐश्वर्य गाथा या दालनाच्या माध्यमातून जगासमोर पोहचणार आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ‘अभिजात मराठी दालना’चे उद्घाटन प्रसंगी केले आहे.
कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या ‘अभिजात मराठी दालना’ चे उद्घाटन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे अन्न, नागरी पुरवठी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, मराठी भाषा सहसचिव मिलिंद गवांदे, अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा.रंगनाथ पठारे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, संमेलनाच्या सर्व समितीचे मुख्य समन्वयक विश्वास ठाकूर, श्रीरंग गोडबोले, उपस्थित होते.
मराठी भाषा मंत्री पुढे म्हणाले की, सर्वसामान्य माणसाला अभिजात मराठी भाषा समजण्यासठी या दालनात मराठी भाषेच्या पुराव्याच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. संमेलनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अभिजात मराठी दालनास भेट देवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सहभागी होऊन मराठी भाषेच्या न्याय्य हक्कासाठी उभे रहावे, असे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सर्व मराठी बांधवांना केले आहे.
अभिजात मराठी भाषेच्या दालनामध्ये प्रामुख्याने मराठीच्या इतिहासाची मांडणी करणारी उदाहरणे, मराठीचे भाषिक आणि कालिक भेद दर्शविणारा आढावा घेतला जाणार आहे. अधिकृत शिलालेखांच्या प्रतिकृती, मराठीच्या मध्ययुगीन वैभवाची मांडणी, बहामनी काल, शिवकालीन, पेशवेकालीन, 19 व्या शतकातील मराठी, आधुनिक मराठी, मराठी साहित्य परंपरेचे दालन अशा दोन हजारी वर्षापूर्वीच्या मराठी भाषेच्या प्रवासा दरम्यानची माहिती देणाऱ्या विविध सबळ पुराव्यांचे आणि संबंधित शिलालेख, ताम्रपट, नाणी, भाषेचे टप्पे, दुर्मिळ ग्रंथ. निवडक गाथा आदीच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन या दालनात ठेवण्यात आल्या असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.