२५ जिल्हा परिषदासह २८३ पंचायत समित्यांसाठी १६ व २१ फेब्रुवारीला मतदान
मुंबई : राज्यच्या मिनी विधानसभेची ट्रायल उद्यापासून सुरू होणार आहे. त्याचे बिगुल आज वाजले. मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान तर २३ ला मतमोजणी होणार आहे. २५ जिल्हा परिषदा व २८३ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यात १६ फेब्रुवारी व २१ ला मतदान होईल. पहिल्या टप्यात १५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या १६५ पंचायत समित्या आणि दुसऱ्या टप्प्यात ११ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या ११८ पंचायत समित्यांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्याची दोन्ही टप्प्यांत विभागणी केली आहे. सर्वांची मतमोजणी २३ फेब्रुवारीला होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी येथील सचिवालय जिमखान्यात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आयोगाचे सचिव शेखर चन्ने हेदेखील यावेळी उपस्थित होते.
सहारिया यांनी सांगितले की, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्व संबंधित जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक नसलेल्या क्षेत्रात नियमित विकास कामांसाठी कोणतेही निर्बंध असणार नाहीत; परंतु निवडणूक असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा करता येणार नाही.
२१ फेब्रुवारीला निवडणूक होणाऱ्या महानगरपालिकांच्या जागा (कंसात मुदत समाप्तीचा दिनांक): बृहन्मुंबई- २२७ (८ मार्च), ठाणे- १३१ (५ मार्च), उल्हासनगर- ७८ (३ एप्रिल ), नाशिक- १२२ (१४ मार्च), पुणे- १६२ (१४ मार्च , पिपरी-चिंचवड- १२८ (१२ मार्च ), सोलापूर- १०२ (५ मार्च), अकोला- ८० (८ मार्च ), अमरावती- ८७ (८ मार्च व नागपूर- १५१ (४ मार्च).
पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारीला निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा : जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील 8 पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभाग. (या जिल्हा परिषदांतर्गतच्या एकूण १६५ पंचायत समित्या)
दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारीला निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदा : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती व गडचिरोली जिल्ह्यातील ४ पंचायत समित्या व त्यातील निवडणूक विभाग (या जिल्हा परिषदांतर्गतच्या एकूण ११८ पंचायत समित्या)
दोन्ही टप्प्यांतील सर्व जिल्हा परिषदांची मुदत २१ मार्च रोजी; तर पंचायत समित्यांची मुदत १३ मार्च रोजी संपत आहे.