मुंबई,(शांताराम गुडेकर) : मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्वगुणसंपन्न असा एकमेव आणि जाणता राजा म्हणजेच ‘शिवाजी महाराज’ महाराजांची धर्मनिरपेक्षता, त्यांचा दैदीप्यमान इतिहास आणि त्यांची लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्था, तसेच त्यांचा धाडसी पराक्रम, आचार-विचार, आदर्शवादीपणा अखंड महाराष्ट्रवासियांच्या मना-मनात जाणवत राहावा. या विचारानेच श्री, महालक्ष्मी कलामंच,मुंबई या हौशी नाट्यसंस्थेने ऐतिहासिक नाट्य-कलेची निवड केली, नाट्याभिनयातून समाज प्रबोधन करण्यासाठी कै. राम शिंदे यांच्या ‘वीर शिवाजी’ या ऐतिहासिक नाटकाची निर्मिती केली. 35 कलाकारांच्या ताफ्यात शनिवार दि. १२ आॕक्टोबर ला रात्री ८ वाजता दामोदर नाट्यगृह,परेल,मुंबई येथे.. नव्या रंगात,नव्या ढंगात रंगणार “वीर शिवाजी” या ऐतिहासिक नाटकाचा रौप्यमहोत्सवी सोहळा रंगणार आहे.
कै. राम शिंदे यांच्या “शिवराज योगी” आणि “अफजलखान”या दोन नाटकाचा संदर्भ घेऊन महाराजांच्या पराक्रमाची अजरामर साक्ष देणारा अफजलखान वध या मध्यवर्ती संकल्पनेतून वीर शिवाजी हे नाटक जन्माला आले आहे. स्वराज्यनिर्मिती काळातंच विजापूर दरबारी स्वराज्य नाशाचा विडा उचलून ‘अफजलखान’ नावाच्या राहुने ग्रासले होते. रयतेचा अनन्वीत छळ करून बाया-बायकांवरील अत्याचाराचा हाहाकार माजवला होता.स्त्रियांच्या आक्रोशाला पारावार उरला नव्हता, म्हणून या मदांध कपटी सैतानाच्या कपटजालातून या भूमीची पुरती सुटका करण्यासाठी, स्वराज्यनाशावर उठलेल्या काळसर्पाला ठेचण्यासाठी राष्ट्रमाता माॕसाहेब जीजाऊंनी शिवबांच्या मनात बळ निर्माण केले.म्हणूनच स्वराज्य निर्मितीचा निर्धार मनी बाळगून शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या संगतीने योजनाबद्ध चतुराईने अफजलखानाचा वध केला.
कोकणातील नमन या लोककलेतून अभिनयाची आवड निर्माण झालेल्या ज्ञात-अज्ञात कलावंताना एकत्र करून स्वबळावर या नाटकाची निर्मिती झाली. ऐतिहासिक नाट्य-कलेची जाण असलेल्या प्रकाश लाड यांसारख्या मातब्बर दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनातून कलाकारांची कला बहरू लागली. प्रायोगिक रंगभूमीवर अभिनयाची छाप पाडणाऱ्या संतोष सारंग या कलाकाराच्या समावेशामुळे सहकलाकारांमध्ये जोश निर्माण होऊ लागला. सुरुवातीचे काही प्रयोग कलाकारांच्या आर्थिक सहकार्याने व त्यानंतर सण- समारंभात मागणी होऊ लागली. बघता-बघता वीर शिवाजी ह्या नाटकाने रसिकांच्या अंतरंगात नाजूक दिलाचा ठाव घेतला. कधी खुल्या तर कधी बंदीस्त रंगभूमीवर या नाटकाचे प्रयोग यशस्वी होऊ लागले.
राजा शिवछत्रपती आणि स्वराज्यरक्षक संभाजी या दूरदार्शन मालिका गाजत असतानाही वीर शिवाजी या नाटकाने रसिकांची वाहवा मिळवली. त्यानंतर काही मार्गदर्शकांच्या मदतीने या नाटकाला गोवा राज्य सांस्कृतिक विभागाच्या सौजन्याने गोवा फेस्टिवल मध्ये सलग आठ दिवस आठ प्रयोग करण्याची संधी मिळाली. परतीच्या प्रवासात लांजा,राजापूर आणि अलिबाग येथिल मिळून सलग ११ प्रयोग एकाच फेरीत मिळाल्याने हा हा म्हणता २४ प्रयोग यशस्वी झाले. या नाटकातील प्रत्येक कलाकार हा नोकरी- धंदा संभाळून ही कलेची सेवा करीत आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या सवडी, वेळेचे नियोजन,
तांत्रिक अडचणींवर मात करीत काही महीन्यांच्या प्रतिक्षेनंतर २५ वा. रौप्यमहोत्सवी प्रयोगाचा मुहूर्त निवडण्यात आला. स्री-पुरूष मिळून ३५ कलाकारांच्या या सांघिक कौशल्याचा हेवा वाटून त्यांच्या जिद्द, मेहनत आणि प्रयत्नांचे कौतुक म्हणून या नाटकाचे लेखक कै. राम शिंदे यांचे संपूर्ण कुटूंबाने मायेचा आधार दिला. त्याचबरोबर कोकणच्या या हौशी कलावंतांना पाठीवर शाबासकीची थाप देत रिपब्लिकन चित्रपट सेनेने व्यवसायिकतेची चालना दिली. या सर्वांच्या कृपेने आणि जाणकार रसिक मायबाप- श्रोत्यांच्या आशिर्वादामुळेच आणि महालक्ष्मी कलामंचाचे सुत्रधार संजय मांडवकर आणि व्यवस्थापक मनोज पाताडे सह प्रदिप रेवाळे, विनायक धामणे, आत्माराम बाचिम, गिरिजा शिंदे,योगेश बांद्रे तसेच प्रायोगिक रंगभूमीवर अभिनय आणि दिग्दर्शनाचा अनूभव असणारे संतोष सारंग यांच्या विश्वासावर 35 कलाकारांच्या ताफ्यात शनिवार दि. १२ आॕक्टोबर २०१९ च्या रात्रौ ८ वा. दामोदर नाट्यगृह,परेल,मुंबई येथे.. नव्या रंगात,नव्या ढंगात रंगणार “वीर शिवाजी” या ऐतिहासिक नाटकाचा रौपमहोत्सवी सोहळा रंगणार आहे. नाट्य रसिकांनी या प्रयोगाला आवर्जून उपस्थित राहवे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.