मानवाचे आयुष्य नेहमीच असंख्य गुंतागुंतींनी जोडलेले असते. सुखी आयुष्य जगत असताना अनेकदा अशा गोष्टी घडतात की आयुष्याची घडी विस्कटते आणि मग ती बसवताना नाकीनऊ येतात. काही जण स्वत:च्या कर्माने आफत ओढवून घेतात तर काहीजण योगायोगाने दुष्टचक्रात अडकतात. हाच धागा पकडत प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांची कादंबरी ‘न्याय- अन्याय’ ही लघुकादंबरी मानवी नात्यांमधले नेमके गुण दोष उघड करते. म्हणूनच ती वाचकांच्या पसंतीस उतरते.
सुहास शिरवळकर उर्फ सुशी या नावाची जादू मराठी वाचकांच्या हृदयात नेहमीच कायम राहिली आहे. त्यांच्या लेखणीने सर्व प्रकारच्या वाचकांना त्यांनी आपलंसं करून टाकला आहे. त्यांनी रहस्यकथा, चातुर्यकथा, भूतकथा, गुन्हेगारी कथा इतकेच काय सामाजिक कादंबरी, ललित – लेखन, कविता, बालकुमार वाड्मय या सर्वच प्रकारात विपुल लेखन केले आहे.
अशा वाचकप्रिय सुशिंचं ‘न्याय – अन्याय’ त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. ‘न्याय- अन्याय’ ही लघुकादंबरी ९१ पानाची आहे. पृष्ठसंख्या जरी कमी असली तरी वाचताना संथपणा जाणवत नाही. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत नेणं हि सुशिंची खास स्टाइल ‘न्याय – अन्याय ‘ मध्ये अनुभवायला मिळते. ”न्याय जेव्हा आधी ठरवला जातो अन मग केस उभी राहते तेव्हा” … ही पुस्तकाची tagline वाचताच क्षणी वाचकांच्या डोक्यात एक ना अनेक प्रश्न उभे राहतात. वाचकांना एकामागोमाग एक धक्कातंत्र देण्यास ही कादंबरी यशस्वी ठरते.
‘न्याय – अन्याय’ मधली कथा समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीची आहे. तो स्वतःच ती कथन करतो. पण तो त्याच नाव जाहीर करत नाही. स्वतः कथन करत असताना त्याच्या भावविश्वाची तो ओळख करून देतो. त्याची साधी- भाबडी पत्नी ‘भावना’ नेहमीच त्याच्या हो ला हो करत आली आहे. तिचा स्वतःच्या नवऱ्यावर गाढ विश्वास आहे. भावनाचा नवरा एक दुहेरी आयुष्य ‘तरंगिणी’ नामक युवतीसोबत गेली ५ वर्ष जगतोय. हे सर्व तो इतक्या शिताफीने करतो कि कोणालाही त्याचा संशय येत नाही.
पुढे, असं काहीतरी घडतं की सर्व फासे उलटे पडतात. मग उरतात ते फक्त प्रश्न… तरंगिणी कोण? नवऱ्याचं काय होते? तरंगिणीचं काय होते? कथेतला ट्विस्ट? …या प्रश्नांची उकल करण्यासाठी ‘न्याय- अन्याय’ नक्कीच वाचायला हवं. या लघुकादंबरीची कथा जरी आपल्या ऐकण्यात, बघण्यात अथवा तत्सम वाचण्यातली असली, तरी ती वेगळी का आहे? हे समजून घेताना कथेतील पात्रं महत्वाची भूमिका बजावतात. पहिल्या भेटीतील ‘तरंगिणी’ आणि ५ वर्षातील ‘तरंग’. तिचा बदलता स्वभाव वाचकाला अवाक करतं.
सुशिंच्या कथा कादंबर्यांमधील पात्रं आणि त्यांची नावं वाचकांच्या इतकी जवळची होऊन बसतात की त्यांना अस्तित्व प्राप्त होऊन ती आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतात. मग उदाहरण म्हणून ‘न्याय- अन्याय’ मधले सरकारी वकील प्रेमनाथ मसानी, श्यामसुंदर घिया, इन्स्पेक्टर अशोक फडकर आपापल्या पातळ्यांवर समर्थपणे उभे राहतात. या कादंबरीत गुन्हा आहे. गुन्हेगार आहे. कोर्ट आहे. इन्स्पेक्टर-वकील असं सर्व आहे. इतकंच काय गुन्ह्याची कबुली सुद्धा आहे. पण मग वेगळा आहे ती गुन्हा कबूल करताना मांडली जाणारी गुन्हेगाराची बाजू. व्यक्ती गुण-दोषांबरोबर कथानक वेग घेत राहतं आणि शेवटी न्याय कोणता? अन्याय कोणता? हे समजून घेताना वाचक अंतर्मुख होत जातात.
पुस्तकाचे नाव – न्याय अन्याय
लेखक – शिरवळकर सुहास
प्रकाशक – दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
मूल्य – ८० रु.
पृष्ठे – ९१