मुंबई, विशेष प्रतिनिधी ः- गेल्या आठ महिन्यात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये उलथापालथ झाली आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट आली तर आघाताने भारतातील नागरिकांचे मानसिक आरोग्याची खच्चीकरण होईल, असे मत मनोविकार तज्ञानी व्यक्त केली आहेत.
कोरोनाच्या महामारीने जगाचे झालेले आर्थीक नुकसान पुढील काही वर्षीही भरून निघणारे नाही. शिवाय, विविध आजारांमुळे मागील आठ महिन्यात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच अनेकांचे उद्योगधंदे बंद झाले आहेत. अनेक नागरिक मानसिक ताण तणावाखाली आले आहेत. बोरीवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मनोविकारतज्ञ डॉ प्रतीक सुरंदशे सांगतात, “कोरोना विषाणू महामारी जर वेळीच आटोक्यात आली नाही, तर मानसिक आजार निगडित विविध समस्यांचा महापूर येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. भारतामध्ये मानसिक आजार आणि त्यांच्या समस्यांकडे केले जाणारे दुर्लक्ष पाहता वैद्यकीय क्षेत्रात तारांबळ उडेल, अशी भीती आहे. लॉकडाऊन’मुळे शाळांमध्ये मुलांचे एकत्र न येणे, एकत्र न खेळणे, कार्यालयात सहकार्यांशी कमी झालेले संवाद, भेटीगाठी कमी झाल्यामुळे नात्यांमध्ये आलेला दुरावा, नोकऱ्यांची झालेली वाताहात याचा एकत्रित परिणाम कुठे ना कुठे प्रत्येकावर झाला आहे. लॉकडाउन नंतर वाढलेली दारू व अंमली पदार्थांची विक्री याचा थेट संबंध कुठे ना कुठे मानसिक आरोग्याशी नक्कीच आहे. आर्थिकबाबी बरोबरच येत्या काळात आत्महत्या, अमली पदार्थांचे सेवन आदी प्रकार वाढण्याची भीती आहे. मानसिक आरोग्य समस्या हे कोरोना महामारी पेक्षाही मोठे संकट आहे व याची दाहकता आज आपण सर्वजण अनुभवत आहे. मानसिक ताण जाणवत असलेल्या नागरिकांनी हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून मदत मागावी, लोकांच्या संपर्कात राहावे, व्यायाम करावा आणि गरज भासेल तेव्हा मनोविकार तज्ञांशी बोलावे, मानसिक ताणतणाव घालवण्यासाठी लोकांनी आपल्या मित्रमंडळी व कुटुंबियांशी सक्रियपणे बोलत राहावे, आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये अथवा मित्र परीवारामध्ये नैराश्याची आणि आत्महत्येच्या प्रवृत्तीची लक्षणे दिसल्यास सावध व्हावे, त्यांच्या शंकांचे निरसन करून देणे ही काळाची फार गरजेचे आहे. सरकारनेही सामाजिक-आर्थिक सुरक्षितता जाळी वाढवणे तसेच मानसिक आजारांचा सामना करणाऱ्यांना आधार देण्यासाठी आणखी काही मार्गांचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.”
जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मलपास यांनी व्यक्त केलेले भाकीत महत्त्वाचे आहे. महामारी मुळे दहा कोटीहून अधिक लोक गरीबीच्या रेषेतून आणखी खाली जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आर्थिक मंदी आणि मानसिक आरोग्य समस्या पसरवण्यापासून थांबवणे ही सध्या जगा समोरील चिंता आहे. कोरोना विषाणूची लागण आपल्याला होईल का व जर झाली तर आपण त्यामधून बाहेर पडू का? तसेच त्यासोबतच विद्यार्थ्याना भविष्याची चिंता, कोलमडलेली आर्थिक व्यवस्था, नोकरी व धंदा गेल्यामुळे कुटुंबावर कोसळणारी आर्थिक संकटांची कुर्हाड या गोष्टींची चिंता आज प्रत्येक वर्गातील नागरिकाला आहे व यातूनच मानसिक विकार वाढण्याची भीती आहे अशी माहिती अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मनोविकारतज्ञ डॉ. प्रतीक सुरंदशे यांनी दिली.