रत्नागिरी,(आरकेजी) : आंबा घाट खूनप्रकरणाचा गुंता सोडविण्यात देवरुख पोलिसांना अखेर यश मिळाले. आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी दोन आरोपिंना पोलिसांनी अटक केली.
आंबा घाटात कुजलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहावर तीक्ष्ण हत्यारांच्या खुणा होत्या. यावरून तो खून होता, हे एव्हाना स्पष्ट झाले होते. मृतदेहाची ओळख मात्र पटत नव्हती. तरिही पोलिसांनी मोठ्या हुशारीने ज्या गोणीत मृतदेह भरून टाकण्यात आला होता, तोच धागा पकडत गुन्ह्याची उकल केली.
इचलकरंजीतील प्रकाश हजारेची कर्जाऊ दिलेले पैसे गोळा करणारा अशी ख्याती होती. त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील डेअरी व्यवसायीक राजू मुलाणी याच्याकडून सहा लाख कर्जाऊ रक्कम वसूल करण्याची सुपारी घेतली होती. राजू याने कर्जाऊ रक्कम गडहिंग्लज येथे फिरवली होती. परंतु, या रकमेची वसुली होत नसल्याने त्याने प्रकाशला सुपारी दिली होती.
प्रकाशने कामाला सुरूवात केली. त्याने काही रक्कम वसूल केली, परंतु ती त्याने राजू याला दिली नाही. उलट वसूल केलेले ३५ हजार रुपये प्रकाशने खर्च केले. तसेच, राजूला दमदाटी करू लागला. अखेर वैतागलेल्या राजूने त्याचा काटा काढायचे ठरविले. त्याने प्रकाशला कोल्हापूर जिल्ह्यातील शिरढोणमधील घरी बोलावले. त्या ठिकाणी राजू आणि प्रकाश यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. रागाच्या भरात राजूने धारधार शस्त्र प्रकाशच्या डोक्यात मारले आणि प्रकाश ठार झाला. त्याचा जीव गेला हे समजताच राजूने मित्र ईश्वर आडसुळे याला मदतीला बोलावले. २० मार्चच्या रात्री त्यांनी प्रकाशचा मृतदेह कारने रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटात आणून टाकला.
प्रकाशला ठार केल्यानंतर राजूने प्रकाशसह आपल्या साथीदाराचे मोबाईल शिरढोण गावातच बंद केले. त्यामुळे मोबाईल लोकेशनवरुन आरोपींचा माग काढणे अवघड ठरत होते. मात्र, आंबा घाटात मृतदेह ज्या गोणीत भरून फेकण्यात आला त्याचा एक धागा पकडत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि देवरुख पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि हत्येचा तिढा सोडवला.
प्रकाशच्या विरोधात इंचलकरंजीमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गुन्ह्यात वापरलेली गाडी आणि इतर सामान पोलिसांनी जप्त केले गेले आहे.